कोल्हापूर:गोकुळ दूध संघाचे ठरावधारक कर्मचारी, दूध संस्था कर्मचारी व कंत्राटदारांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन संचालक युवराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. यांचे सर्व ठराव पात्रच होणार आहेत, असेही या पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकात श्री. पाटील यांनी पुढे म्हटले आहे, आजच सर्वोच्च न्यायालयाने अवसायनातील सर्वच संस्थांना पात्र करण्याचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निकाल दिला. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. अशोक गाडे यांनी विभागीय सहाय्यक उपनिबंधक श्री. देविदास मिसाळ यांना कायदेशीर प्रक्रिया पालनाबाबतचे पत्र पाठवलेले आहे. या पत्राचा चुकीचा अन्वयार्थ लावून काही अपप्रवृत्ती अफवा पसरवित आहेत. वास्तविक; आजच्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी तयार करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) 2014 व संस्थेचे उपविधीनुसार, सर्वोच्च न्यायालय- दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच- कोल्हापूर यांनी पारित केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करून अंतिम मतदार यादी तयार करण्याची दक्षता घ्यावी.
पत्रकात पुढे म्हटले आहे, गोकुळ दूध संघाचे ठराव धारक कर्मचारी दूध संस्थांचे कर्मचारी व कंत्राटदार यांचा समावेश आतापर्यंतच्या कच्च्या यादीमध्ये आहे, या यादीमधून त्यांना वगळलेले नाही. त्यामुळे पक्क्या यादीतून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विभागीय सहाय्यक उपनिबंधक श्री. देवीदास मिसाळ आणि सहनिबंधक दुग्ध श्री. कृष्णा ठाकरे यांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक चुकीच्या केल्या होत्या. त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, अशा स्पष्ट सूचना याआधीच निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. अशोक गाडे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. आज काढलेल्या आदेशातही या सूचनांचाच पुनरुल्लेख आहे. अशा पद्धतीने ठराव अपात्र करण्याची कोणतीही तरतूद महाराष्ट्र सहकारी कायद्यात व गोकुळ दूध संघाच्या उपविधीमध्ये नाही. त्यामुळे अशा सर्व ठरावधारकांना मतदानाचा अधिकार नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार मिळणारच आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सत्यमेव जयते……!
