मुख्यमंत्री साहेब या लेकींचा काय दोष ? : राजू शेट्टी

कुंभोज (विनोद शिंगे)
कर्जापायी बापानं गळफास घेतला आणि त्याच्या मृत्युनंतर त्याच्या हातबल झालेल्या गर्भवती बायकोने स्वतः आत्महत्या केली.
ही दुर्दैवी घटना आहे मराठवाड्यातील.
परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना या गावातील…या गावात १५ दिवसापुर्वी सचिन जाधव या शेतक-याने कर्जास कंटाळून आत्महत्या केली. आणि अर्धांगिनीची दुर्दैवी भुमिका बजावत त्याच सायंकाळी त्याच्या ७ महिन्याच्या गरोदर पत्नीनेही आत्महत्या केली… खरं तर कर्जबाजारी शेतक-याने असं किडामुंगीसारखं मरणं महाराष्ट्राला नवं नाही…भामट्यांना लाखो कोटी रूपयांची कर्ज माफ करताना काही हजारांसाठी इज्जतवान कास्तकाराला जीवाची होळी करावी लागणं ही विकसित म्हणून टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात नित्याचंच आहे.

 

साहेबराव करपे यांच्या आत्महत्येनंतर घडलेली ही तशाच प्रकारची ही हदयद्रावक आत्महत्या होती. सदरची घटना घडल्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन त्या कुटूंबाची भेट घेतली…घर तरी कसलं हो…तडे गेलेल्या भिंती , गंजलेल्या पत्र्याचे छत व मोडकी तोडकी भांडी… आणि तिथं होते सचिनचे असहाय्य वयस्कर वडील , त्याचा हतबल भाऊ व नकळत्या वयात आई बाप गमावलेल्या ५ व ३ वर्षाच्या कार्तिकी व श्रीया या दोन निरागस मुली …!!
‘ दिस जातील, दिस येतील…भोगं सरलं, सुखं येईल…’
या आशेवरच इथला शेतकरी तग धरून राहतो…कर्ज काढतो, ते फेडण्यासाठी जिवाचं रान करतो… मरणं हे कुठल्याही समस्येवरचं अंतिम उत्तर नसतं हे त्याला माहीत असतं… आणि आपण मेलो की आपली सोन्यासारखी पोरंबाळं उघडी पडणार हे ही त्याला कळत असतं…सचिनलाही हे नक्कीच समजत असणार… तरीही त्यानं असा निर्णय का घेतला असेल…? किती अगतिक, असहाय्य, हतबल झाला असेल तो…? मानसिक दृष्ट्या किती खच्चीकरण झालं असेल त्याचं…?? या विचारानेच डोळे पाणावताहेत…

सचिनचं मरणं म्हणजे शेतकऱ्याचा खोटा कळवळा आणणाऱ्या सरकारला मारलेली सणसणीत चपराक आहे… अर्थात या निष्ठूर,उलट्या काळजाच्या राक्षसांनी अशा कितीही चपराकी खाल्ल्या तरी त्यांचा निर्लज्जपणा जाणार नाहीच…पण प्रश्न आहे तो सचिनच्या कुटुंबियांचा…
कर्ज माफ होईल या आशेवर संसाराचा गाडा ढकलणाऱ्या सचिनच्या मरणावर २८ मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेल्या ‘ कर्जमाफी होणार नाही तातडीने पिककर्ज भरावे ‘ या फर्मानाने शिक्कामोर्तब केले…अजित दादा रूबाबात बोलून गेले,पण कर्जमाफीच्या आशेवर बसलेल्या सचिनच्या काळजावर जणू क्विंटलचा दगडच टाकला…१५ दिवस विवंचनेत काढले , आणि त्यानंतर त्याने कर्जास कंटाळून आत्महत्या केली…लगेचच सायंकाळी त्याच्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीनेही आपले जीवन संपविले …गरीबीतही आनंदात जगणा-या एका घरावर जणू वरवंटाच फिरला…क्षणात होत्याच नव्हत झालं…
हे अतिशय वेदनादायी आहे…पण हे एवढ्यावरच संपलं नाही… यापुढे खरी संघर्षाची सुरवात झाली आहे. सचिनच्या दोन निरागस मुली एक कार्तिकी व दुसरी श्रीया या दोघांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या पुढील आयुष्याचा संघर्ष डोळ्यांसमोर येतो…आई नाही, बाप नाही…बिनलग्नाचा चुलता, थकलेला आजोबा…अठरा विश्व दारिद्रय सोबतीला घेऊन निखा-यावर ठेवलेल्या तव्यात भाकर टाकण्यासाठीही आता गरतीचा हात उरला नाही…या पोरी नशीबाचे चटके कुणाच्या भरोशावर सोसणार…? घराला पडलेले तडे पाहणार की शिक्षणाचे धडे गिरवणार …?मुलाच्या आत्महत्येनंतर हतबल झालेले असहाय्य आजोबा कोणते हट्ट पुर्ण करणार…? आई-बापाकडून मिळणारं प्रेम , माया ,ममता या निष्पाप जीवांना कोण देईल आता…? आणि तसा प्रयत्न केला जरी कुणी,तरी ख-या आई बापाची सर येईल त्याला…?
त्या घरातून बाहेर पडल्यानंतर अशाच प्रश्नांनी गर्दी केलीय मनात…शेवटी माझंही काळीज बापाचं आहे हो…!!
म्हणूनच, आई – बापाविना उघड्या पडलेल्या त्या लेकरांचा, या कपटी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि दिलेल्या शब्दावरून फिरण्याच्या कृतघ्नतेमुळे बळी गेलेल्या कर्त्या पुरुषाच्या घराचा आक्रोश सरकारला दाखविण्यासाठी मी व माझे सहकारी माळसोन्ना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रखरखत्या उन्हात पदयात्रेस सुरवात केली. पडणा-या प्रत्येक पावलाबरोबर निरागस दोन मुलींचा चेहरा व त्यांचा भविष्यातला संघर्ष माझ्या मनाला खूप वेदना देत होत्या. एका दाण्याचे हजार दाणे करणा-या माझ्या शेतक-याने अशी काय चुक केली की त्याची किंमत त्याच्या संपुर्ण कुटूंबाला चुकवावी लागत आहे..? राज्यकर्त्यांनी त्यांच्या स्वार्थी सत्तेच्या हव्यासापोटी दिलेली आश्वासने एखाद्या कुटूंबाचा किती मोठ्या प्रमाणात विध्वंस करू शकतात हे या घटनेवरून लक्षात येते. एवढी भयावह घटना घडूनही राज्यातील एकाही राज्यकर्त्यांने त्याठिकाणी जाण्याच औदार्य दाखविले नाही. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या तर महिला आहेत. एक स्त्री म्हणून जगत असताना आई , बहीण , पत्नी या सर्व भुमिका पार पडणा-या पालकमंत्र्यांना किमान त्या लेकरांच्या संघर्षाची जाणीव होवून त्यांना पाझर फुटेल अशी अपेक्षा होती पण ती पण फोलच ठरली…
रखरखत्या उन्हामध्ये या सर्व विचारात मी त्या लेकरांना सोबत घेऊन शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचलो व त्यांच्या हाताने दळभद्री सरकारला निवेदन दिले. एक जबाबदार बाप व भाऊ म्हणून माझे अंतर्मन मला शांत बसू देत नव्हते शेवटी मी ठरवलंय कि या दोन्ही मुलींची जबाबदारी आपण पार पाडायची… भलेही बाप व आई म्हणून त्यांना दररोज मायेने गोंजारण व रागावणं शक्य नाही पण त्यांना समाजात ताठ मानेन उभ करणं हे माझ कर्तव्य समजून त्या मुलींच्या संगोपनाची जबाबदारी मी स्विकारतोय.
मुख्यमंत्री महोदय,
तुमच्या लेकीला दहावीला पडलेल्या ९२ टक्क्यांचा आनंद तुमच्या बरोबरच सगळा महाराष्ट्र साजरा करतोय…त्या आनंदातूनच थोडा वेळ काढून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा व सांगा या दुर्दैवी लेकींचा….
यात त्यांचा दोष काय..

🤙 9921334545