मुंबई: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.


मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात आयोजित मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते.बैठकीस आमदार प्रताप अडसड, नाना पटोले,विनोद अग्रवाल, अभिमन्यू पवार,राजू तोडसाम आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री गोगावले म्हणाले,
योजनेतील कामे वेळेत व दर्जेदार व्हावीत,केंद्र सरकारकडून प्रलंबित निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा, तसेच रोहयो अंतर्गत न होणारे रस्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत,अशा सूचना मंत्री श्री गोगावले यांनी दिल्या.
मंत्री श्री गोगावले म्हणाले की, “शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी योग्य रस्ता सुविधा मिळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. कामांची गुणवत्ता राखत ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष लक्ष द्यावे.
राज्यमंत्री श्री जयस्वाल म्हणाले,
ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी कामांसाठी पर्यायी समायोजन करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. मजूर उपलब्ध नसणे ही अंमलबजावणीतील मोठी अडचण असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.