वाचनामुळेच माणूस अधिक प्रगल्भ: नंदकुमार मोरे

कोल्हापूर: वाचनामुळेच माणूस अधिकाधिक प्रगल्भ बनतो, असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित साहित्यकृतींचे अभिवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

 

डॉ. मोरे म्हणाले, आज मोबाईलच्या युगात वाचन कमी झाले असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे, तरच आपण समृद्ध होऊ शकतो.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले की, वाचन ही आनंद देणारी गोष्ट आहे. आपण अनेक चांगल्या साहित्यकृतींचे वाचन केले पाहिजे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी काय वाचले पाहिजे, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

सदर साहित्यकृतींचे अभिवाचन कार्यक्रमांतर्गत मराठीतील निवडक साहित्यकृतींचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये योगिता ठोंबरे (नदीष्ट-मनोज बोरगावकर), प्रज्योती शिंदे (झाडवाटा-आनंद यादव), पृथ्वीराज पाटील (ढव्ह आणि लख्ख ऊन-राजन गवस), जय बाचनकर (डियर तुकोबा-विनायक होगाडे), संजना शेरखाने (एक पत्र भाईसाठी-सुनिता देशपांडे), प्रमोदिनी पुंगावकर (चानी-चिं.त्र्यं.खानोलकर), प्रांजली क्षिरसागर (माझ्या इंग्रजीची बोलू कौतूके-मंगला गोडबोले), हिना दळवी (पर्स हरवलेली बाई-मंगला गोडबोले), स्मिता राजमाने (संगीत देवबाभळी-प्राजक्त देशमुख), ज्योती चौरे (भुरा-शरद बाविस्कर), ऋणाली नांद्रेकर (आहे हे असं आहे-गौरी देशपांडे), करूणा उकीरडे (आता अमोद सुनासि आले-दि.बा.मोकाशी) या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिवाचनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पारदे तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी एम.ए. भाग एक-दोन आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.