पंतप्रधानांच्या ध्यानधारणेला डीएमकेचा विरोध

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून ४८ तास कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. आता डीएमकेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रचार संपल्यानंतरच्या शांतता कालावधीत अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या प्रचार करण्यास मनाई असते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता नियमाला बगल दिली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर डीएमकेने थेट या दौऱ्याला विरोध दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत म्हणजेच शनिवार संध्याकाळपर्यंत विवेकानंद स्मारकात मौन धारण करुन ध्यानधारणा करणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही घोषणा केली आहे. त्यासाठी कन्याकुमारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ध्यानधारणेला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके या पक्षांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, अभिषेक मनु सिंघवी सय्यद नासीर हुसेन यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी अर्ज दिला आहे आणि हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

“निवडणूक होण्याच्या ४८ तास आधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या कुणालाही प्रचार करता येत नाही. तो शांतता काळ असतो. कितीही मोठा नेता असूद्या कुणालाही हे करता येत नाही. आमचा कुणाचं मौनव्रत, ध्यानधारणा याबाबत काहीही आक्षेप नाही. मात्र शांतता काळात अप्रत्यक्षरित्या प्रचार होऊ नये. तसे घडले तर आचारसंहितेचे ते उल्लंघन आहे.” असे अभिषेक मनु सिंघवींनी म्हटले आहे.

डीएमकेने या दौऱ्याचा विरोध केला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. कन्याकुमारीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे की  विवेकानंद स्मारकात ध्यान करण्यासाठी पंतप्रधान मोदींना संमती देऊ नये.