कोल्हापूर:सहनिबंधक- दुग्ध श्री. कृष्णा ठाकरे यांनी अवसायनात काढलेल्या संस्थांपैकी २९८ संस्थांचे अपील विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक दुग्ध अधिकारी देविदास मिसाळ यांनी मंजूर केले. त्यामुळे अवसायनात काढलेल्या दूध संस्थेच्या मतदानाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

छोट्या दूध संस्थांचा जिद्द आणि चिकाटीचा न्यायालयीन लढा यशस्वी झाला. न्यायालयीन लढाईतील या यशामुळे छोट्या दूध संस्थांना अवसायनात काढण्यासाठी खटाटोप करणाऱ्या अदृश्य शक्तीला पुन्हा एकदा मोठी चपराक बसली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विभागीय उपनिबंधक श्री. मिसाळ यांच्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार अपील दाखल केले होते. या अपिलांची सुनावणी पुण्यात शुक्रवारी दि. १४ पार पडली होती व हा निकाल राखीव राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी दि. १७ त्याचा निकाल देण्यात आला. सुनावणीअंती सर्व २९८ संस्थांची अपिले मंजूर करण्यात आली. सहाय्यक निबंधक दुग्ध श्री. कृष्णा ठाकरे यांनी दिलेले अवसायनाचे आदेश बेकायदेशीर ठरवून रद्दबातल करण्यात आले आहेत. नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संस्थांना बाजू मांडण्याची संधी न दिल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले होते. ते सर्वच निष्कर्ष ग्राह्य धरून श्री. देविदास मिसाळ यांनी हे आदेश पारित केले आहेत.
या निकालामुळे पावसाळ्यात काढलेल्या सर्व संस्थांचा मतदानाचा मार्ग आता मोकळा झाला असून संस्थांवर केलेली कारवाई बेकायदेशीर होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या प्रकरणात संस्थांच्यावतीने अॅड. प्रबोध पाटील, अॅड. के. डी. पवार आणि अॅड. योगेश शहा यांनी बाजू मांडली.
ही तर नागराजाची कृपा……!
याबाबत विकास पाटील- कुरूकलीकर म्हणाले, आज नागपंचमीचा सण. बळीराजा आणि नागाराजाचे नाते पिढ्यानपिढ्याचे आहे या निकालाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळालेला हा न्याय, ही जर नागराजाचीच कृपा आहे…. .!
