राज्य शासनाच्यावतीने खेतवाडी येथे राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिस्तंभ उभारण्याची मागणी

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथे राज्य शासनाच्यावतीने स्मृतिस्तंभ उभारावा, असा ठराव राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत करण्यात आला.

त्याचबरोबर ६ मे २०२२ रोजी कोल्हापूर ते खेतवाडी ‘शाहू विचार यात्रा’ काढण्याचा निर्णयही घेण्यात आला.राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीने शुक्रवारी शाहू स्मारक भवनात विविध संघटना व शाहू प्रेमीची बैठक घेण्यात आली.

मल्हारसेनेचे प्रमुख बबन रानगे यांनी प्रास्ताविकामध्ये बैठकीचा उद्देश सांगितला.शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी मुंबईतील खेतवाडी येथे निधन झाले. मात्र दुर्दैवाने तिथे साधा फलकही नाही. तिथे स्मृतिस्तंभ उभा करत असतानाच जन्मभूमी ते स्मृतिस्तंभ अशी रथयात्रा काढावी, अशी सूचना रानगे यांनी केली.