कागल:राष्ट्रसंत श्री. कैकाडी महाराज यांनी संपूर्ण आयुष्यभर समाजाला मानवतेची महान शिकवण दिली, असे उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. मानवांनो, माणुसकीला जागा…. जरा माणसात मिसळून वागा, असा संदेश ते समाजाला द्यायचे, असेही ते म्हणाले.

कागलमध्ये कोरवी समाजाच्यावतीने आयोजित राष्ट्रसंत श्री. कैकाडी महाराज जयंती कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे हेही उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत श्री. कैकाडी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रसंत श्री कैकाडी महाराज यांनी समाज परिवर्तनासाठी स्वतःचा देह झिजवला. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यामुळेच त्यांना कन्नड, तेलगू अशा काही भाषाही येत होत्या. कागल शहरात कोरवी समाजाने संघटित होऊन संत कैकाडी महाराज जयंती पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. हातावरती पोट असलेला अत्यंत प्रामाणिकपणे काबाडकष्ट करून जगणारा हा समाज आहे. या समाजाने दर्जेदार आणि गुणवत्त शिक्षण घेऊन फार मोठ व्हावं. तसेच; वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणालाही चालना मिळावी, अशी कैकाडी बाबांची इच्छा होती.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, राष्ट्रसंत श्री. कैकाडी महाराज यांनी महाराष्ट्रासह अनेक प्रांतामध्ये जाऊन समाज प्रबोधन केले व कठीण तपश्चर्या केली. कागल शहरातील कोरवी समाजाने संघटित होत राष्ट्रसंत श्री. कैकाडी बाबा जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनपर पद्धतीने साजरी केली. कैकाडी समाज हा काबाडकष्ट करणारा अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू समाज आहे. बँड हा पारंपारिक व्यवसाय असलेल्या या समाजाने हा व्यवसाय पुन्हा नव्याने आधुनिकतेसह नीटनेटकेपणाने सुरू करावा. या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
शिका आणि मोठं व्हा…….!
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, श्री. कैकाडी बाबांनी कीर्तने, प्रवचने, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाहास प्रतिबंध,अस्पृश्यता निर्मूलन याद्वारे समाज प्रबोधन केले. या समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जाती- जमातीमध्ये आहे. समाजाने मुलांना दर्जेदार शिकवावे आणि आरक्षणाचा उपयोग करून शासकीय नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करावे.
यावेळी अध्यक्ष विक्रम कोरवी, उपाध्यक्ष भिकाजी कोरवी, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक आनंदा पसारे, सुशांत कालेकर, माजी नगरसेवक विवेक लोटे, माजी नगरसेविका जयश्री कोरवी, श्रीकांत कोरवी, सुधाकर कोरवी, विक्रम कोरवी, डॉ. तुषार कोरवी, रणजीत पाटील, बाळू कोरवी, तानाजी कोरवी, गजानन माने, विशाल कोरवी, अविनाश कोरवी, अंकुश कोरवी आदी प्रमुखांसह समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
