दूधगंगा नदीवरील प्रस्तावित पाणी योजना रद्द करण्यासाठी मंत्रालयस्तरावर व्यापक बैठक बोलवण्याची मागणी

कागल: दुधगंगा नदीवरील सुळकुड येथून इचलकरंजी शहरास पाणी पुरवठा करणारी योजना रद्द करणेसंदर्भात मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व संबधित विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलवावी. अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तसेच काळम्मावाडी धरणाच्या गळती काढण्यासाठीच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी. अशीही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनातील मजकूर असा. सुळकूड, ता. कागल येथून दुधगंगा नदीवर इचलकरंजी शहराकरिता पाणी पुरवठा करणेची योजना मंजूर होऊन प्रत्यक्ष काम चालू करणेचे नियोजन होत आहे. पण या नदीवर अवलंबून असणाऱ्या गावा बरोबरच दूधगंगा नदीकाठावरील आणखी ब-याच गावांना मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे या भागातील सर्व ग्रामस्थांनी या योजनेस मोठया प्रमाणात विरोध केला असून त्याकरिता जन अंदोलन उभा केले आहे. दूधगंगा नदीवरील ही योजना रद्द करण्याकरिता या लोकांची मानसिकता फार टोकाची होऊन बसली आहे. त्यामुळे या योजनेसंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन ,प्रत्यक्षात आपण लक्ष घालून दूधगंगा नदीवरील ही योजना रद्द करणे संदर्भात मा. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री , त्याचबरोबर या संबंधित विभागाचे अधिकारी यांची एक व्यापक बैठक मंत्रालय स्तरावर आपल्या पुढाकारातून घ्यावी.

तसेच २५.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या मुख्यभिंतीस काही वर्षापूर्वी गळती निर्माण होऊन सुरुवातीस प्रतिसेकंद ६० लिटर पाणी वाया जात होते. आज ती गळती इतकी मोठया प्रमाणात वाढली आहे की आता जवळपास प्रतिसेकंद ३७५ लिटर पाणी गळतीमार्फत वाया जात आहे.शिवाय धरणास धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. ही गळती काढण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे.तो त्वरीत मंजूर करावा व ही गळती योग्य तंत्रज्ञानाद्वारे काढण्यासाठी संबंधित विभागास आदेश निर्देशित करावेत अशी आग्रही विनंतीही निवेदनाद्वारे केली आहे.

🤙 8080365706