
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला दिलासा दिला असला तरी खडे बोलही सुनावले आहेत. यावेळी त्यांनी सरकारमध्ये मध्यस्थी करण्यास नकार देत आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर थेट लंडनहून प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,मी या आधीच सांगितले होते की, अपात्रतेचा निर्णय फक्त अध्यक्षच घेऊ शकतात. संविधानात तशी तरतूद आहे आणि सुप्रीम कोर्टानेही तसाच निर्णय दिला आहे. अपात्रतेचा निर्णय केवळ विधानसभा अध्यक्ष घेतील. कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींचं विश्लेषण कोर्टाने दिलं आहे,” “व्हीप कोणी दिला पाहिजे, राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं हा निर्णयही अध्यक्षांनी घ्यायचा आहे. यापूर्वीही मी सांगत होतो की, अध्यक्षच अधिकृत व्हीप कोणाचं आणि राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं तसंच अपात्रतेसाठी करण्यात आलेल्या याचिका वैध आहेत की नाही यासंबंधि निर्णय अध्यक्ष घेतील,” असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
