
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी पोटनियमातील तरतुदीनुसार हरकत घेतलेले 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे मोठा धक्का बसल्यानेच विरोधकांनी थेट निवडणूक यंत्रणेवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. पूर्णपणे पारदर्शकपणे झालेल्या या छाननी प्रक्रियेत विरोधकांनी आमच्या उमेदवारांवरही आक्षेप घेतले होते पण हे आक्षेप कायद्याच्या कसोटीवर न टिकल्याने आमच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. छाननी ही निवडणूक कार्यक्रमातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. पण महाडिक द्वेषातून विरोधक आता निवडणूक यंत्रणेलाही बदनाम करू लागले आहेत.
आज अर्ज अवैध ठरलेल्या 29 लोकांसाठी विरोधकांचा जळफळाट होत आहे, पण जेव्हा 1899 सभासदांना त्यांनी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मात्र त्यांची ही आपुलकीची भावना जागी झाली नाही ! सभासदांचा कळवळा असल्याचा दिखावा करणाऱ्यांनी सभासदांवर आक्षेप घेतलेला तो दिवस म्हणजे काळा दिवस होता. मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद आहे. सर्जेराव माने हे कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत. त्या काळात त्यांनी अनेक वेळा पोटनियमांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे आता रडत बसण्यापेक्षा त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरू नयेत यासाठी खबरदारी त्यांनी आधीच घ्यायला हवी होती. निवडणुकीसाठी एकूण 237 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी हरकती घेतलेले फक्त 29 अर्ज आज अपात्र ठरवलेले आहेत. अजूनही 198 अर्ज शिल्लक असताना आमचे विरोधक सत्तेचा गैरवापर वगैरे बाता मारत आहेत. एवढ्यावर मैदान संपलेलं नाही, ही आता फक्त सुरुवात आहे. मग आताच एवढा आकांडतांडव कशाला ? विरोधी आघाडीतील हे 29 वगळता इतर उमेदवांना घेऊन त्यांनी सक्षम पॅनल बनवावं, त्यांना घेऊन त्यांनी मैदानात उतरावं. आम्ही आधीपासूनच मैदान लढवायला तयार आहोत. त्यांच्या उर्वरित उमेदवारांवर त्यांचा विश्वास नाही का ? की ते उर्वरित उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सक्षम नाहीत ? हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे.
रीतसर नियमांचे पालन करत निवडणुकीचा हा पहिला टप्पा आम्ही पार पाडला आहे. पण आमचे विरोधक मात्र एवढ्यानेच विचलित झालेले पाहायला मिळाले. रागाने धमक्या देणाऱ्या विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे की, अशी मग्रुरीची भाषा सहन करायला हा डि.वाय. पाटील कारखाना नाही. हा १२२ गावातील सभासदांच्या मालकीचा राजाराम कारखाना आहे. इथला सभासद ही भाषा कधीही सहन करणार नाही. इथे लोकशाही पद्धतीने कारभार चालतो आणि कायम चालत राहणार. असे वक्तव्य आमदार अमल महाडिक यांनी केले.
