
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर खोकला आणि घशाच्या खवखवीने हैराण झाले आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील वातावरणातील बदलामुळे सध्या खोकला, घशाची खवखव याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे.
त्यामुळे घशाची खवखव व खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.मुंबईमध्ये सध्या रात्री थंडी तर दिवसा कडक उन्हाळा असे वातावरण आहे. या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून मुंबईतील नागरिकांच्या घशात खवखव वाढली असून, त्यांना खोकल्याचा त्रास होत आहे.
तसेच अनेकांना खोकला व सर्दीचा त्रास होत आहे. खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडे घशातील खवखव व खोकल्याच्या रुग्णांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या कान-नाक-घसा रुग्णालयामध्ये दररोज ४०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. मात्र काही दिवसांपासून यामध्ये घशाची खवखव, खोकला, सर्दी यासारख्या आजाराने त्रस्त असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात येत असून, हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
