कोल्हापूर:डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (टाटा आयआयएस), मुंबई यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राच्या गरजांनुसार अत्याधुनिक तांत्रिक कौशल्ये, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स येथे झालेल्या या सामंजस्य करारावर कुलगुरू डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता आणि टाटा आयआयएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी गोयल यांनी स्वाक्षरी केली. यावेळी विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अध्ययन व संशोधन संचालक डॉ. योगेश चिमटे, टाटा आयआयएसचे लीड मॅनेजर (अकॅडमिक पार्टनरशिप) डॉ. सचिन सावंत, आणि सहाय्यक महाव्यवस्थापक राधेश्याम चौहान आदी उपस्थित होते. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रगत तांत्रिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रयोगशाळा प्रशिक्षण, इंटर्नशिप, औद्योगिक अनुभव आणि कौशल्यविकासाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता म्हणाले, हा सामंजस्य करार विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. या सहकार्यामुळे शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक दृढ होईल आणि भविष्यातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मदत होईल.
निधी गोयल म्हणाल्या, डी. वाय. पाटील विद्यापीठासोबतचा हा करार विद्यार्थ्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार प्रगत कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. भविष्यातील कुशल आणि उद्योगसज्ज मनुष्यबळ घडविण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.
