कोल्हापूर:शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन करून कृषी उत्पादन क्षमता वाढविण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ला उत्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानातर्गत डी. वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या तळसंदे येथील कृषी विज्ञान केद्रामार्फत कोल्हापूर जिल्ह्यात ९० गावामधील १८ हजार शेतकऱ्यांशी शास्त्रज्ञानी संवाद साधला. कृषी विभाग आणि आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत सहा तालुक्यातील ९० गावांमध्ये शेतकऱ्यांना पिक उत्पादन तंत्रज्ञान, पशुपालन, प्रक्रिया, महिला आरोग्य आणि पोषण तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. ऊस, भात, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, आधुनिक मशागत, सुधारित बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, सिंचन तंत्र, कापणीचे योग्य तंत्र अशा सर्व बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आली.
या अभियानादरम्यान झालेल्या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची सकारात्मक मानसिकता तयार झाली असून, या उपक्रमामुळे उत्पादनवाढीसह उत्पन्नवाढीस हातभार लागेल असा विश्वास, डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी व्यक्त केला.
या अभियानामध्ये फळपिके, भाजीपाला व फुलशेती या महत्त्वाच्या क्षेत्रांतील आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानावरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. योग्य पीक निवड, आंतरपीक पद्धती आणि एकात्मिक कीड नियंत्रण, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, संतुलित आहार, रोग प्रतिबंधक लसीकरण, दुभत्या जनावरांची निगा आणि चारा व्यवस्थापन, महिला शेतकऱ्यांसाठी ‘महिला आरोग्य व पोषण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाचे महत्त्व, कृषी आधारित लघुउद्योग, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवस्थापन व विपणन कौशल्य, शासकीय योजना, अनुदान, कर्ज सुविधा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यांची माहिती देण्यात आली.
‘माहिती रथ’च्या माध्यमातून बीज प्रक्रियेची प्रत्यक्ष पद्धत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखविण्यात आली. यामध्ये ट्रायकोडर्मा, रिझोबियम व थायरम यासारख्या जैविक व रासायनिक उपचारांमुळे पिकांची रोगप्रतिकारकता वाढवून अधिक उत्पादन कसे घ्यावे हे दाखवण्यात आले.
या अभियान काळात भारतीय कृषी अनुसंधान परिषद, पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालयचे डॉ. अरविंद कुमार वर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ गणेश कदम, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. संजय कड, शास्त्रज्ञ (कृषि विस्तार) डॉ बशीत राजा, वैज्ञानिक डॉ. सत्यवान आगिवले, क्रांतिसिंह नाना पाटील पशू वैद्यकीय महाविद्यालय शिरवळ सहा. प्रा. डॉ. सुनील कराड, विभागीय कृषी संशोधन केंद्र सहा. प्रा. डॉ. संभाजी जाधव, कोरोमंडलचे इंटरनॅशनलचे अमोल मलकमीर, धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
या कार्यक्रमसाठी डी वाय पाटील एजुकेशन सोसायटी कृषी विज्ञान केंद्रचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयवंत जगताप, प्रा. सुधीर सूर्यगंध, प्रा. दीपक पाटील, प्रा. राजवर्धन सावंत भोसले, प्रा. दिपाली मस्के, डॉ निनाद वाघ यांचे मार्गदर्शन तर प्रा. गंगासागर मोर, प्रकाश पाटील, रोहन साळोखे, बाजीराव पाटील, राजू माने, आणि रवींद्र शिंदे यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.