मुंबई:अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीममुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आमदार सतेज पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टी यामुळं शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी, अद्यापही काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुमारे अडीच हजार हेक्टर जागेवरील फळे, भाज्या, तसेच रब्बी आणि खरिप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी १३,३६१ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. मात्र, काही शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानीचे पैसे मिळाले नसल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. जळगाव, धुळे, सांगली, अकोला, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि इतर जिल्ह्यात हजारो हेक्टर जमिनीवरील फळे तसेच पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात ग्रामस्तरावर महसूल, ग्रामविकास तसेच कृषि विभागातर्फे पंचनामे सादर करण्यात आले होते. बाधित शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत करण्यासाठी वाढीव स्वरुपात मदत करण्यास मान्यता देण्यात आली होती.
याबाबत राज्य सरकारने कोणती कार्यवाही केली? अद्यापही काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले. यावर बोलताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी, नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या आर्थिक मदतीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे. त्या शेतकऱ्याच्या खात्यावर डीबीटी द्वारे थेट पैसे जमा करण्यात आल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. तर ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली नाही, त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.