कोल्हापूर : दूधगंगा पाटबंधारे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली,तामगाव, मुडशिंगी, वसगडे आदी गावांमध्ये काम अपूर्ण आहे. वेळोवेळी सांगूनही ठेकेदार हे काम पूर्ण करण्यात दिरंगाई करत आहेत. यामुळे या परिसरातील शेतजमिनी सिंचनाखाली येण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
या संदर्भात तसेच अतिवृष्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती आमदार आमल महाडिक यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने मंत्री महोदयांच्या दालनात बैठक संपन्न झाली. कालव्याचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या तसेच अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी जलाशयातील पाणीसाठा आणि विसर्ग यांचे नियोजन करावे असे निर्देशही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
या बैठकीनंतर संबंधित अधिकारी ठेकेदारांना अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात सूचना देतील अशी आशा आहे.