मुंबई : राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चर्चा झाली. यावेळी परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
मुख्यमंत्री यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे
✅परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी तसेच पुरेसा बंदोबस्त ठेवावा
✅विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगण्यास मनाई
✅भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावे
✅संवेदनशील केंद्रांवर ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवावी
✅जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करावी
✅प्रत्येक तालुक्यात विशेष प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी
परीक्षा काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते.