कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने संघटन वाढवू : नाम.चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी संघटनेच्या आधारावर चालणारी पार्टी असून सरकार आणि संघटना याच्यातला समन्वय ठेवून भविष्यकाळात वाटचाल केली जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

 

याप्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार हे पूर्ण बहुमतात स्थापन झालेले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला गतिमान पद्धतीने काम करायचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ही विकासाची गंगा अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या दहाच्या दहा आमदाराच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. अशा काळात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना सुद्धा आपल्याला बलवान करायच्या असून त्यासाठी येत्या 19 फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या सभासद नोंदणी अभियानामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपला विजय हा आपल्या सक्षम बूथचा विजय असल्याचे सांगत जिह्यातील बूथ रचनेचा आढावा घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्या बूथवरील नागरिकांना करून द्यावा असे सांगितले.
संघटनात्मक कामात रचनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणे पक्षात आणि सरकारात चांगली जबाबदारी दिली जाईल. नजीकच्या काळात विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करावे लागेल तसेच आगामी होणाऱ्या समिती रचना यामध्ये सुद्धा पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका स्वीकारली जाईल त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठीच पुढील काळात काम केले जाईल असे सांगितले.
यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, अरुणराव इंगवले, राहुल चिकोडे, भाजयूमो प्रदेश सचिव अल्केश कांदळकर, सरचिटणीस शिवाजी बुवा, डॉक्टर आनंद गुरव, सौ सुशीला पाटील, डॉ .स्वाती पाटील गायत्री राऊत, अशोक देसाई, शहाजी भोसले, डॉ राजवर्धन, विजय भोजे, अरुण इंगवले, अमरसिंह भोसले, राजू प्रभावळकर, सचिन शिपुगडे, मंदार परीतकर, संभाजी आरडे, प्रमोद कांबळे, दत्तात्रय मेडशिंगे आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.