कोल्हापूर : काळमवाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून दिवसेंदिवस दुधगंगा धरणाची गळती वाढू लागली असून प्रत्यक्षात सेकंदाला जवळपास ६५० ते ७०० लिटर पाणी या गळतीमधून वाया जावू लागला आहे. याबाबत शासनाने येत्या १५ दिवसात कार्यवाही न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या गळतीमध्ये कापडी बोळे भरून शासनाच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
काळमवाडी धरणाच्या गळतीबाबत स्वाभिमानीच्या पदाधिकारी यांचेसोबत राजू शेट्टी यांनी धरणाच्या गळतीच्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. दुधगंगा धरणातून झालेल्या गळतीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून २०२२ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे मात्र शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून बेदखल करण्यात आहे.
दिवसेंदिवस या गळतीचे प्रमाण वाढत असून संपुर्ण धरणाच्या भिंतीना पाझर दिसू लागला आहे. ठेकेदार व अधिका-यांच्या भ्रष्ट्र कारभारामुळेच गळतीचे प्रमाण वाढू लागले आहे.
गळतीमुळे धरणाचा पाणीसाठा कमी होवून ऐन उन्हाळ्यात व जूनमध्ये पाऊस लांबल्यास यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता पडण्याची शक्यता आहे. यामुळे लोक प्रतिनिधी आणि अधिका-यांनी जनतेच्या हिताचा विचार करून भ्रष्ट्र कारभाराचे हितसंबंध बाजूला ठेवून सदरचे काम तातडीने पुर्ण करण्याची मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार , कागल तालुका अध्यक्ष डॅा. बाळासाहेब पाटील , तानाजी मगदूम , प्रा. जरग सर , इंद्रजित भारमल यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित होते.