मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्या ; जयंत पाटील यांचा मोदींना टोला

मुंबई : “मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते निळवंडे धरणासह विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, १९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे ९०० कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण केले. या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः या कार्याची तीनदा जाऊन पाहणी केली.

महाविकास आघाडी मधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनोच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता, मात्र त्या परिस्थितीतही आम्ही विकास कामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

🤙 8080365706