शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ; चौदा हजार शाळा होणार बंद…

मुंबई : राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे.तसेच याबाबतचे प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यातून राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात २० पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या १४ हजार ७८३ शाळा बंद होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील. याशिवाय खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले आहे.

शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ ते २० पटसंख्येच्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. त्यात १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी, तर २९ हजार ७०७ शिक्षक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून, समूह शाळा निर्णा करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.