केडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमा……

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या १८ ते ८५ वर्षांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार सभासद शेतकऱ्यांना अपघाती मृत्युपोटी दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरला आहे. विमा हप्त्याची एक कोटी, १९ लाखाची सर्वच रक्कम जिल्हा बँकेने भरली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली..

यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बंधूंना कोणतीही तोशीस लागणार नाही. लवकरच निविदा मागवून जिल्हा बँकेकडे पगाराची खाती असलेल्या नोकरदारांसाठी ३० लाख रुपयांच्या सामूहिक अपघाती विमा सुरक्षेची योजना आणण्याचा निर्णयही बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झाला.

शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेत समाविष्ट अपघातांच्या प्रकारांमध्ये रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश आहे. *याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत अपघाती मृत सभासदाच्या वारसाला दोन लाख रुपये भरपाई मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख, ८५ हजार, ८८० कर्जदार सभासद शेतकऱ्यांना या विमा सुरक्षेचे कवच लाभले आहे. कायमचे आणि अंशतः अपंगत्व आल्यासही शेतकऱ्याला या योजनेमधून भरपाई मिळणार आहे.

कर्त्या कुटुंब प्रमुखाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शेतकरी कुटुंब उघड्यावर पडू नये, या उद्देशाने संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ईफको टोकियो जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीला धनादेश दिला. मुदत एक वर्षापर्यंत आहे.*  *यावेळी बँकेचे संचालक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खासदार डाॅ. श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

अशी आहे शेतकरी अपघात विमासुरक्षा योजना…….

● इफको-टोकीयो जनरल इन्शुरन्सच्या सहयोगातून अपघाती विमा योजना…..

● सेवा संस्थाकडील किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार असलेल्या एकूण दोन लाख, ८५ हजार, ८८० शेतकऱ्यांना विमा सुरक्षाकवच……

● अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई…….

● कायम व अंशतः अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना त्या- त्या प्रमाणात भरपाई…….

● शेतकऱ्यांना तोशीस लागू न देता बँकेनेच उचलला आहे विमा हप्त्याचा भार….

कोल्हापूर -केडीसीसी बँकेच्या शेतकरी अपघात विमा योजनेच्या हप्त्याचा धनादेश शाखाधिकारी आशिष साळी व ऑफीसर अमोल सूर्यवंशी यांच्याकडे देताना बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी संचालक मंडळातील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खासदार डाॅ. श्रीमती निवेदिता माने , प्रताप उर्फ भैय्या माने, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.