
कोल्हापूर : दहावीचा निकाल लागल्यापासून निराश झालेल्या पाचगाव येथील बळवंतनगर येथे राहणाऱ्या आर्यन राजेंद्र पाटील (वय 16) या सध्या अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
शाहू टोल नाक्याजवळ लक्ष्मणराव ढोबळे वस्तीगृहासाठी बांधलेल्या इमारतीच्या चौथ्या मोजल्यावरून आर्यनने उडी मारली. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आर्यन पाटील हा रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मित्रांबरोबर खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मोरेवाडी परिसरातील एका टर्फ मैदानावर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत खेळत होता. त्यानंतर सर्व मित्र घरी जात होते. यावेळी आर्यनने मी थोड्यावेळाने घरी जातो. असे सांगून मित्रांना तेथून घालवले. त्यानंतर तो तेथून एका वसतिगृहाचे इमारतीकडे गेला. त्याच्या वडिलांनी त्याचा मित्रांकडे चौकशी करायला सुरुवात केली तरी मित्रांनी तो मोरेवाडी परिसरातच थांबला असल्याचे सांगितले. त्यानंतर राजेंद्र पाटील व आर्यनचे मित्र त्याचा शोध घेऊ लागले. अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारतीच्या पाठीमागच्या बाजूस कोणीतरी पडल्याचे आढळल्याने सर्वजण तेथे धावतच गेले. त्यावेळी आर्यन विव्हळत पडल्याचे दिसून आले. वडिलांनी आर्यानला काय झाले असे विचारले त्याने चौथा मजल्यावरून उडी मारल्याचे सांगितले. त्याला त्या अवस्थेत उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.राजेंद्र पाटील हे शिवाजी विद्यापीठात नोकरीस आहेत. वसतिगृहासाठी बांधून अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारतीच्या बाजूला आर्यन पडला होता. त्याचा पाय मोडला होता. पण हे ठिकाण निर्जन असल्याने आणि इमारत पडीक असल्याने कोणाला लवकर कळाले नाही.
