श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. याच संदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असंही अमित शाह यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी हे वक्तव्य केलं आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं की, “श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. माझं संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केलं असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल.”