राजाराम कारखान्याकडून २९०० रुपये दर जाहिर !

कसबा बावडा (प्रतिनिधी) : छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चालू हंगाम २०२२-२३ मध्ये ऊसाला एकरकमी प्रतीटन २९०० रुपये देणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी जाहिर केले. शासन आदेशाप्रमाणे कारखान्याची या हंगामाची निव्वळ देय एफ.आर.पी. ही या वर्षीच्या गळीत हंगामातील साखर उताऱ्यावर व प्रत्यक्ष होणाऱ्या ऊस तोडणी वाहतुक खर्चावर आधारीत असणार आहे. तथापी सध्याला मागील हंगामातील साखर उतारा व ऊस तोडणी वाहतुक खर्च विचारात घेऊन हा ऊस दर जाहिर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे कार्यक्षेत्र ७ तालुक्यात १२२ गावात विखुरलेले असून जवळपास ७० ते ७५ किलोमिटर अंतरावरून वाहतुक करून ऊस आणवा लागतो. कार्यक्षेत्रातील बरीचशी गावे नदी काठावर वसली असल्याने बऱ्याच वेळा ऊस क्षेत्र पूरबाधित होते. सभासद शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अशा पूरबाधित नोंद क्षेत्रातील संपूर्ण ऊस आपला कारखाना गळीतास आणतो. तसेच कारखाना कार्यक्षेत्राचे भौगोलिक स्थान व हवामान विचारात घेता आडसाली ऊस लागणीचे प्रमाण अन्य कारखान्यांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे गळीतासाठी येणाऱ्या एकूण ऊसापैकी उच्च साखर उतारा असलेल्या ऊसाचे प्रमाण कमी आहे. कमी वयोमानाचा ऊस कारखान्यास गळीतास आल्याने साखर उताऱ्यात घट होते, परंतू सभासद शेतकऱ्यांना मात्र तीन वर्षात तीन पिके घेता आल्याने अप्रत्यक्षपणे त्यांच्या ऊस बिलातील उत्पन्नात वाढच होते.

कारखाना शहरी वस्तीमध्ये असल्याने सहविज निर्मिती प्रकल्प व विस्तारीकरणास जागेची अडचण भासते आणि पंचगंगा नदी काठापासून कारखाना अत्यंत जवळ असल्याने इथेनॉल सारखा नवीन प्रकल्प उभारणीस तांत्रिक अडचणी उद्भवतात. आपल्या कारखान्याचा कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त उत्पन्न नसताना देखील निव्वळ साखरेच्या उत्पन्नावर आधारीत अन्य कारखान्यांच्या बरोबरीने आपल्या कारखान्याने हा ऊस दर जाहिर केलेला आहे, आपल्या कारखान्याच्या वजन काट्यावर आणि मिळत असलेल्या ऊस दरावर सर्वच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने सर्वजण निश्चिंतपणे आपल्या कारखान्यास ऊस पुरवठा करतात. ही बाब सर्व ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. आम्ही सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य दर जाहिर करतो किंवा जाहिर वाच्यता न करता देखील इतर कारखान्यांच्या बरोबरीने आदा करतो याचा ठाम विश्वास आमच्यावर सभासद शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे तो तसाच ठेवावा आणि आपल्या शेतामधील पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन देखील श्री. महादेवराव महाडिक यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हा.चेअरमन वसंत बेनाडे, संचालक अमल महाडिक व इतर सर्व संचालक, प्रकाश चिटणीस कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706