पाणी ओसरू लागले; कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू

प्रयाग चिखली (वार्ताहर) : पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यामुळे पूरस्थिती आज शुक्रवारीही सकाळपर्यंत पूरस्थिती जैसे थे होती. दरम्यान शुक्रवार दुपारपासून पाणी ओसरू लागले आहे. मात्र पाणी अत्यंत धिम्या गतीने ओसरत आहे.

दरम्यान कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील केर्ली येथील जगबुडी पुलाजवळील रस्त्यावरील पुराचे पाणी कमी झाल्याने येथील वाहतूक चालू झाली आहे. क्षेत्र प्रयाग येथील रस्त्यावरील पाणी कमी झाल्यामुळे चिखली ते वरणगे दरम्यानची वाहतूक ही सुरू झाली आहे. एकंदर पावसाची उघडीप आणि पुराचे वाढणे कमी झाल्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

धरणाचे दरवाजे चालू बंद होत असल्यामुळे परिसरात पुराचे पाणी तुंबून राहिले आहे त्यामुळे प्रयाग चिखली परिसरातील हजारो एकर ऊस शेती पीक कुजण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने पुढाकार घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी परिसरातील पूरग्रस्तांची मागणी आहे.