शहर, उपनगरातील चोऱ्या थांबविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर : शहर आणि उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या आशा सूचना त्यांनी केल्या. शहर आणि उपनगरात गस्त वाढवून मोरेवाडी, पाचगाव जुना वाशी नाका, कळंबा या परिसरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच दुरुस्त केले जातील ,अशी ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे यांनी यावेळी दिली.

या भेटीवेळी आ. पाटील यांनी उपनगरांमधील कॅमेरे बंद असल्यामुळे चोरट्यांचा वावर वाढत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. पाचगाव ,मोरेवाडी, जुना वाशी नाका, कळंबा या परिसरात जवळपास 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यातील बरेच कॅमेरे बंद असल्याचे त्यानी सांगितले.

पाचगाव, मोरेवाडी कळंबा या परिसरातील सीसीटीव्हीचे कंट्रोल रूम हे कळंबा या ठिकाणी करण्यात आले आहे. या ठिकाणचं लाईट बिल अधिक असून पोलिस प्रशासनाने ते अदा करावे, अशी विनंती पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी केली.

जिल्हा पोलिस प्रमुख बलकवडे यांनी सांगितले की, ज्या परिसरात चोऱ्या झाल्या आहेत त्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कळंबा सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधील वीज बिल मिटर हे पोलिस प्रशासनाच्या नावावर घेवून वीज बिल अदा केले जाईल. तसेच 30 लाख रुपये खर्च करून गांधीनगर परिसरात सुद्धा सीसीटीव्हीचे 182 कॅमेरे बसवले जाणार आहेत. सानेगुरुजी वसाहत ,संभाजीनगर या ठिकाणी नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो शासनाला पाठवला जाणार आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी शिष्टमंडळाला सांगितले.

या शिष्टमंडळात पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडी सरपंच रूपाली बाजारी, पाचगाव उपसरपंच स्नेहल शिंदे, सुदर्शन पाटील प्रशांत देसाई, अभिजीत भोसले, संग्राम पोवाळकर, सुनील शिंदे, नारायण गाडगीळ यांचा समावेश होता.