कोल्हापूर :महामंडळाचे कोल्हापूर येथील मिश्र खत कारखान्यामध्ये उत्पादित होणारे मिश्र खत मुख्यतः कृषि-उद्योग १८:१८:१० चा पुरवठा कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच धाराशिव व पुणे या जिल्ह्यांमध्ये केला जातो. कृषि उद्योग मिश्र खतांना शेतकऱ्यांची पसंती असून बाजारात इतर खतांच्या किंमती वाढल्याने कृषि उद्योग मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

सद्यस्थितीत महामंडळाच्या खत कारखाना, कोल्हापूर येथे १८:१८:१० मिश्र खताचे एका सत्रामध्ये उत्पादन सुरू असून, प्रतिदिन सुमारे ४० मे. टन उत्पादन होत आहे. कारखान्याच्या मंजूर उत्पादन क्षमतेनुसार वार्षिक क्षमता १६००० मे. टन आहे. त्यामुळे खरीप व येणाऱ्या रब्बी हंगामातील वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा सुरळीत पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपलब्ध यंत्रसामग्री व उत्पादन क्षमतेचा अधिकाधिक वापर करत द्वितीय उत्पादन सत्राच्या शुभारंभ कृषी मंत्री आणि अध्यक्ष महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळ दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीने झाला.
या प्रसंगी कृषि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल , कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कामगार आयुक्त डॉ. एच.पी.तुम्मोड, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे तसेच महामंडळाचे सर्व विभागीय व्यवस्थापक, कारखाना व्यवस्थापक, मुख्य कार्यालयातील संबंधित अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
व्दितीय सत्र सुरू केल्याने प्रतिदिन ४० मे. टन खताचे अधिकचे उत्पादन होणार आहे व कारखान्याच्या वार्षिक उत्पादन क्षमतेएवढे उत्पादन घेणे शक्य होणार आहे.
