साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे -‘सह्याद्री’ चे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित शिंदे यांचे प्रतिपादन  -डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ कार्यशाळा  

कोल्हापूर:साखर कारखानदारीचा समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणावर मोठा प्रभाव असून हा उद्योग ग्रामीण विकासाचा कणा आहे. साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराडचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित शिंदे यांनी केले. 

 

 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा होते.

 

शिंदे पुढे म्हणाले, शेतकरी, ग्राहक आणि शासन यांच्यात समतोल राखणे हे मोठे आव्हान असून उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन अत्यावश्यक आहे. इथेनॉलसारख्या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या उत्पादनांमुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होत असून चक्रीय र्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना स्वीकारणे ही काळाची गरज आहे.

 

स्कूल ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. साखर उद्योगासामोरील आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि उपपदार्थांचे मूल्यवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले.

 

कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी साखर कारखान्यांचे शिक्षण, सामाजिक विकास आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीतील योगदान स्पष्ट केले.

 

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख संशोधन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले.

 

यावेळी आयोजित परिसंवादात डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप पाटील, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक जयकुमार पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे एस. बी. चरापले, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाइड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजीचे विशाल भास्कर आणि इथेनॉल उद्योजक अभिजित पाटील यांनी साखर उद्योगातील नव्या संधी, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

 

यावेळी डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, शेतकरी, साखर उद्योगातील अधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनासाठी अभिजित पाटील आणि श्री. सागर जानराव यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन डॉ. रेणुका तुरुंबेकर यांनी केले, तर डॉ. आसावरी यादव यांनी आभार मानले.

 

 

🤙 8080365706