कोल्हापूर: कोल्हापूर शहरालगतच्या उचगाव, वसगडे, सरनोबतवाडी, मणेरमळा आणि मुडशिंगी या परिसरात “ताडी माडी” या नावाने मानवी आरोग्यास घातक असलेले पेय मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे.
रिपब्लिकन सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि पश्चिम महाराष्ट्र उपप्रमुख जितेंद्र कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, किशोर वयापासून ते 25 ते 30 वयोगटातील तरुण या “ताडी माडी”चे व्यसनाधीन झाले आहेत. नशा आणि “झिंग” येण्यासाठी यामध्ये गोळ्या, गांजा आणि इतर हानिकारक पदार्थ मिसळले जात असल्याची चर्चा आहे.
मोठ्या प्रमाणात तरुण या व्यसनामुळे आपले आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त करत आहेत. तरीही याबाबत पोलिसांना कोणतीही गुप्त माहिती मिळत नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. वसगडे येथील पोलीस पाटलांना याबत माहिती असूनही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर “ताडी माडी” विक्रेत्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेने केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
