कोल्हापूर : कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देतो असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिले होते. मराठा समाज आतुरतेने आरक्षणाची वाट बघत होता मात्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेत आहेत मात्र त्या अधिवेशनात काय चर्चा करणार हे सरकार सांगत नाही त्यामुळे सरकार केवळ मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र मराठा आरक्षणावर अद्याप कोणताच निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही. गुरुवारी 21 डिसेंबरला सरकारचे एक शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते मात्र चर्चा फिसकटली. याआधी राज्य सरकारने 40 दिवस मागितले मात्र तेव्हाही राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही आता फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार वारंवार मराठा समाजाला तारखा देत असून मुख्यमंत्री मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. एका बाजूला मराठा समाज आरक्षणाची आतुरतेने वाट बघत आहे मात्र दुसऱ्या बाजूला सरकार ‘तारीख पे तारीख’ देत आहे, अधिवेशनामध्ये जुन्या योजनांना सजवून नव्याने सांगण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आता मार्चपर्यंत आचारसंहिता लागू शकते जर 24 डिसेंबर पर्यंत ठोस निर्णय घेता येत नसेल तर सरकारने २४ डिसेंबर तारीख का दिली असा सवाल करत सतेज पाटील यांनी आरक्षणावरून राज्य सरकारला टोला लगावलाय.
दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांचे बोलवते धनी कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचं सरकारचं षडयंत्र आहे. सरकारमधील एका मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य थांबत नाहीयेत याचा अर्थ हे वक्तव्य सरकारचेच समजायचे का असा सवालही आम. पाटील यांनी केलाय.
- देश हुकूमशाहीकडे चालला आहे – तीन कायदे पास करण्यासाठी भाजप सरकारने विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केले आहे. विरोधी खासदार असते तर हे कायदे पास झाले नसते भविष्यात एखादा शब्द जरी विरोधात बोलला तर तो देशद्रोह ठरू शकतो म्हणून हा कायदा पास व्हावा यासाठीच खासदारांचं निलंबन केले आहे. खासदारांचे निलंबन करून त्यांनी एक नवीन इतिहास केला आहे मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजप सरकारला जागा दाखवेल आणि इंडिया आघाडीला निवडून देईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.