कागल( प्रतिनिधी ) : आत्तापर्यंत ठिबक हे आपण फक्त पिकाच्या उत्पादन वाढीसाठी वापरत होतो पण येत्या काळात अनियमित पावसाची परिस्थिती पाहता पाण्याच्या नियोजनासाठी आपण ठिबक सिंचनचा वापर केला पाहिजे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
छ.शाहू साखर कारखान्याच्या ऊस पिक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील व व्हीएसआय पुणे चे प्रमुख शास्ञज्ञ डाॅ.अशोक कडलग हे प्रमुख उपस्थित होते.
या वेळी बोलताना घाटगे म्हणाले की,शाहू कारखान्याने सन २००३ मध्ये ऊस विकास संकल्पना सुरु केली होती.
येत्या काळात आपल्या शेतात खतांचा किती वापर करायचा.जमिनीला किती खतांची आवश्याकता आहे. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.बहुतांशी वेळा गरजेपेक्षा जास्त खते आज वापरली जातात.खतांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.त्यामुळे माती परीक्षण आणि खतांचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे.
या वेळी मार्गदर्शन करताना डाॅ.अशोक कडलग म्हणाले सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे.सतरा प्रकारच्या अन्नद्रव्यासह खनिजद्रवे व सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के हवा व २५ पाणी तर ५० टक्के सेंद्रिय कर्ब ची केलेली शेती यशस्वी ठरते.या मुळेच आपले पूर्वज यशस्वी होत होते.आता नवनवीन वाण व अधिक उत्पादन देणा-या जातींमुळे जमिनीचा पोत खालावला आहे.त्यामुळे खर्च भरमसाट व उत्पादक्ता कमी झाली आहे.ती वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
या वेळी एकशे सत्तावीस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिक स्पर्धा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्वागत शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास शाहू ग्रुपच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, सर्व संचालक-संचालिका, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,ऊस उत्पादक,शेतकरी व सभासद उपस्थित होते.