
महाशिवरात्री वर्षातून एकदा येणारा महत्वाचा प्रसंग असून यंदा १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्री आहे. तर जाणून घेऊयात का साजरी केली जाते महाशिवरात्री.

प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते.
जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.
महाशिवरात्री कथा
समुद्र मंथना वेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झाले होते. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होते ते म्हणजे अमृत कोणी घ्यायचं यावरून, कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. परंतू मंथनातून हे अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले.यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन घेतलं आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास नीळकंठ असे ही म्हटले जाते. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पोर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.
