
पणजी : शाळेत शिस्त ठेवण्याच्या हेतूने कोणत्याही विद्यार्थ्याला फटकारणे वा योग्य शिक्षा देणे हा प्रकार कोणत्याही गुन्ह्यांच्या कक्षेत येत नाही.त्यांना शिस्तप्रिय बनवण्यासाठी ही अगदी सामान्य बाब आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.

एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपल्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दंडुक्याने मारहाण केल्याचा आरोप ठेवत कनिष्ठ न्यायालयाने एक दिवसाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. सुमारे चार वर्षांनंतर हा निकाल फिरवत गोवा खंडपीठाने वरील निर्वाळा दिला.न्या. भरत देशपांडे यांच्या एकल खंडपीठाने म्हटले की, प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिस्त लावणे आणि त्यांच्यात चांगल्या सवयी विकसित करण्याच्या प्रामाणिक हेतूने शिक्षकांना अनेकदा कठोर भूमिका घ्यावी लागते.प्राथमिक शाळांमध्ये ही बाब सामान्य असून, हा कोणताही गुन्हा नाही. शिक्षणासोबतच जीवनातील अन्य काही महत्त्वाच्या आणि नैतिक बाबी आत्मसात करण्यासाठी मुलांना विद्यार्थ्यांच्या रूपात शाळेत पाठविण्यात येते. शाळा निर्मितीचा उद्देश फक्त अभ्यासक’मांतील विषयांना शिकविणे नसून, त्यांना भविष्यात एक चांगला व्यवहारकर्ता सक्षम नागरिक बनविण्याचा आहे, असेही एकल खंडपीठाने स्पष्ट केले.
