महाराष्ट्र दिन उत्साहात; जिल्हा परिषदेत अभिमानाने फडकला तिरंगा

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा गौरवशाली दिवस म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र दिन आज जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद परिसरात सकाळपासूनच उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शिल्पा शशीकांत खोत यांच्या हस्ते ध्वजावंदन करून करण्यात आली. राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना उपस्थितांनी “भारत माता की जय” व “जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत व जिल्हा परिषद कर्मचारी कलामंचाच्या वतीने राज्यगीत सादर करण्यात आले.

 

या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. तानाजी पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष जोशी, जिल्हा परिषद सदस्य मा. श्रीम. शिवानी भोसले व मा. श्रीम. स्नेहल वेल्हाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. जयंवत उगले यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे कोल्हापूर जिल्हा प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी राज्याच्या प्रगतीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

🤙 8080365706