कोल्हापूर:”राज्यातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी असलेला हक्काचा निधी कागदावरच जिरवला जात आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात तात्काळ ‘विशेष घटक योजना कायदा’ (SCSP/TSP Act) लागू करावा. अन्यथा, कोल्हापूर ते मुंबई मंत्रालय असा तीव्र संघर्ष छेडला जाईल,” असा खणखणीत इशारा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले यांनी दिला.
हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित पँथर आर्मीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि ‘पँथर आर्मी दिनदर्शिका २०२६’ च्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भीमगायक सुरेश सातारकर होते.
’नोशनल एक्सपेंडिचर’च्या नावाखाली फसवणूक
प्रशासकीय त्रुटींवर प्रहार करताना आठवले म्हणाले की, “रस्ते आणि पुलांच्या कामात दलितांचा १६ टक्के निधी खर्च झाल्याचे दाखवून ‘नोशनल एक्सपेंडिचर’चा आकड्यांचा खेळ मांडला जात आहे. आम्हाला विमानतळाचे कागदी आकडे नकोत, तर थेट लाभ देणाऱ्या योजना हव्या आहेत. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील जमिनीचे दर बाजारभावाप्रमाणे (रेडी रेकनरच्या १.२५ पट) निश्चित करावेत.”
उद्योजकतेसाठी ‘अण्णासाहेब पाटील’ मॉडेलची मागणी
मागासवर्गीय तरुणांना केवळ चहाच्या टपऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना मोठे उद्योजक बनवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे महामंडळानेही १० ते ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा द्यावा आणि विना-तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
नवनियुक्त रणरागिणींचा गौरव
या सोहळ्यात पँथर आर्मीच्या महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला:
छाया सातारकर: जिल्हाध्यक्ष (महिला आघाडी)
रेखा भोरे: हातकणंगले तालुका उपाध्यक्ष
अर्चना कांबळे: हुपरी शहराध्यक्ष
रुपाली पालखे: उपाध्यक्ष
शोभा कांबळे: संघटक
कल्पना कांबळे: वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा अर्चना ढाले, समीर विजापुरे, मच्छिंद्र रुईकर, संजय कांबळे, मुकेश घाटगे, नितेश कुमार दीक्षांत, बबन तांदळे, सिद्धार्थ कांबळे, आनंदा तरटे, भिकू कांबळे, भैयासाहेब धनवडे, संतोष खरात, भिकाजी अप्पुगडे, संदेश कांबळे, महेंद्र कांबळे, अमोल कांबळे, सचिन कांबळे, भास्कर कांबळे (गुरुजी), सत्यभामा कांबळे यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जय भीम गायन पार्टीने सादर केलेल्या भीमगीतांनी कार्यक्रमात चैतन्य भरले.
