विद्यार्थ्यांनो,टोकाचे पाऊल उचलू नका;ध्येय साध्य होईपर्यंत कठोर परिश्रम करा–राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी)
“शैक्षणिक क्षेत्रातील अपयशासह अपेक्षित गुण न मिळाल्याने काही विद्यार्थी नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलत आहेत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.कोणतेही अपयश हे अंतिम नसते,तर ते यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. निश्चित केलेले ध्येय साध्य होईपर्यंत कठोर परिश्रम करा.असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
शाहूनगर,गणेश नगर व काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शाहू पतसंस्थेचे संचालक व प्रगतशील शेतकरी संजय अतवाडकर होते.

समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, “शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी सुविधा मिळतात.तरीही शिक्षकांची मेहनत,पालकांचे पाठबळ आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांच्या जोरावर ते यशस्वी होत आहेत.छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून अशा यशस्वी विद्यार्थ्यांचा मला प्रचंड अभिमान आहे.म्हणूनच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करीत आहोत.अशा सत्कारामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.छत्रपती शाहू महाराजांच्या कागलला शैक्षणिकदृष्ट्या आदर्श घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

यावेळी राजे बँकेचे संचालक अरुण गुरव, संजय कांबळे, मनोज गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे,युवराज पसारे,बाळासो नाईक,राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत,संचालक रणजीत पाटील,नंदू माळकर,संदीप पसारे,प्रमोद सोनुले,सज्जन पवार,असिफ मकानदार,नानू म्हाळुंगकर,संतोष कोरवी,सनी अतवाडकर,प्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. समीर पाटील यांनी स्वागत केले. प्रकाश राणे यांनी आभार मानले.

उज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकांचा विचार करा…

शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर असल्याचे दिसते.तरीही ग्रामीण भागात नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार पहावयास मिळत आहेत.ग्रामीण असो वा शहरी दोन्हीही भागातील विद्यार्थ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालक व शिक्षकांच्या त्यांच्याकडून असलेल्या चांगल्या अपेक्षांचा व पाहिलेल्या स्वप्नांचा विचार करावा.अशावेळी शिक्षक,पालक, विद्यार्थी यांनी बोलून योग्य मार्ग निवडावा, असा सल्लाही घाटगे यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांना दिला.

🤙 9921334545