साखर कारखान्याची श्वेतपत्रिका महिन्याभरात काढणार :मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : एकीकडे उसाची एफआरपी वाढत असताना, दुसऱ्या बाजूला साखरेच्या दरातील वाढ पाहता, संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडील सर्व साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका महिन्याभरात काढणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या रथयात्रा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा साखर कारखाने तीन महिने चालले असून हे विदारक चित्र बदलण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा लागेल. कारखान्यांनी या नवतंत्रज्ञानासाठी पुढाकार घ्यावा, त्याला जिल्हा बँक मदत करेल, उसाचे एकरी उत्पादन वाढल्याशिवाय आगामी काळात साखर उद्योग चालणार नाही. यामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान आशेचा अंधूक किरण दिसत आहे.

महायुतीने सुरू केलेल्या योजनांबाबत विरोधक अफवा पसरवत असून, एकही योजना बंद होणार नाही. राज्याची आर्थिक घडी सक्षम करत असताना विकासकामांना पैसे कमी न पडता योजना सुरू ठेवल्या जातील. लाडक्या बहिणींनाही योग्य वेळी २१०० रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.