कागल : पारंपारिक पद्धतीने ऊस शेती करुन उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही.प्रगत तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एआयसारख्या तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेतीत पन्नास टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी आता एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय पर्याय नाही. असे प्रतिपादन राज्य साखर संघाच्या संचालिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनाअंतर्गत विविध योजनेतील लाभार्थी सभासद शेतकऱ्यांना अनुदान चेक वाटप कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनांत सभासद शेतक-यांनी सक्रिय सहभाग नोंदवून अनुदानाचा लाभ घेतला.
सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीमती घाटगे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,संचालक सचिन मगदूम,शिवाजीराव पाटील उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
छायाचित्र-कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस विकास योजना अंतर्गत इंदूबाई झांजगे या सभासदांना अनुदान चेक वाटपवेळी अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, शिवाजी पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण
ऊस पिक परिसंवादाचा फायदा -श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे
कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे कमी असलेले उसाचे उत्पादन वाढविल्याशिवाय त्यांना शेती परवडणार नाही. म्हणून स्वर्गीय राजेसाहेब यांनी ऊस विकास योजना व ऊस पिक परिसंवाद संकल्पना यशस्वीपणे राबवली.यामध्ये सभासद शेतक-यांसोबत मी स्वतः सहभागी झाले. यामधून नवीन तंत्रज्ञान समजले. याचा फायदा ऊस उत्पादन वाढीसाठी माझ्यासह सर्व शेतकऱ्यांना झाला. असे प्रतिपादन श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
‘शाहू’ एआय तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणार- जितेंद्र चव्हाण
प्रास्तविकपर मनोगतात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, शेतीतील क्रांतिकारी बदलासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. शासनही त्यास प्रोत्साहन देत आहे. कारखान्याचे संस्थापक स्व. राजेसाहेब यांनी ऊस विकास योजनांचा कार्यक्रम नियोजनबद्धपणे राबविला व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवले. हीच परंपरा जोपासताना कारखाना कार्यक्षेत्रात एआय तंत्रज्ञान वापरासाठी शाहू कारखाना प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी कारखाना कार्यस्थळावर शेतक-यांसाठी येत्या चोवीस एप्रिलला प्रशिक्षणपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. अशीही माहिती त्यांनी दिली.