कोल्हापूर : पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी पौष्टिक तृणधान्य महोत्सव व मिलेट बाईक रॅलीचे आयोजन नरतवडे, ता.राधानगरी येथे करण्यात आले होते.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आहारात तृणधान्यांचे अत्यंत महत्त्व आहे. तृणधान्यांचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू बोर्ड प्रमाणेच “मिलेट बोर्ड” स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली.
जिल्ह्याच्या अर्थकारणाला समृद्ध करण्यात शेती आणि शेतकरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचा विचार करुन शेतीसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील.
सध्याच्या फास्ट फुडच्या जमान्यात वरई, नाचणीला आपण विसरत चाललो आहोत. परंतु आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या घरात तृणधान्यांपासून विविध पदार्थ बनवून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या पदार्थांचा आहारात वापर वाढवावा.
शेतकऱ्यांनी हेक्टारी 125 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध भागातील वातावरणाचा विचार करुन त्यानुसार विविध पिके घेण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. नाचणी, वरई सारख्या तृणधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा. आहारातील मिलेटचे महत्त्व पटवून देण्यात मिलेट महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून राज्याला दिशादर्शक ठरेल अशा भव्य कृषी महोत्सवाचे नियोजन करावे अशा सुचना अधिकाऱ्यांना केल्या.
शेती पिकांवर फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कमी पाण्यात पूर्ण पिकांवर आधुनिक व समांतर पद्धतीने फवारणी केली जात आहे. यामुळे कमी कष्टात पैशाची व वेळेची बचत होत फवारणी होत आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा उपयोग करुन घेवून अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीवर भर द्यावा. यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी नंदकिशोर सुर्यवंशी-सरकार, अशोकराव फराकटे, शिवाजीराव चौगले, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कागल राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी (करवीर) अरुण भिंगारदेवे, नाचणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश बन, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाडी यांच्यासह प्रमुख मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते.