राजू शेट्टी यांनी थकीत उसबिले शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची साखर आयुक्तांकडे केली मागणी

कोल्हापूर : साखर आयुक्त कार्यालयाकडे राज्यातील उस उत्पादक शेतक-यांची २३४९ कोटी रूपयाची एफ. आर. पी थकीत असल्याची चुकीची आकडेवारी असून राज्यातील उस उत्पादक शेतक-यांचे जवळपास ७ हजार कोटी रूपयाचे एफ. आर. पी थकीत आहे. यामुळे संबधित साखर कारखान्यांच्यावर आर. आर. सी अंतर्गत कारवाई करून तातडीने उसबिले शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी राज्याचे साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांचेकडे केली.

 

 

 

उस उत्पादक शेतक-यांना एक रक्कमी एफ. आर. पी देण्याबाबत गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील थकीत एफ. आर. पी बाबत राजू शेट्टी यांनी आज पुणे येथे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी थकीत एफ. आर. पी बरोबरच काटामारी , रिकव्हरी चोरी , वजनकाटे ॲानलाईन करणे ,तोडणी वाहतूकीचा खर्च अंतरावर निर्देशात करण्यात यावा , थकीत एफ. आर. पी १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात यावे , राज्यातील साखर कारखान्यांचे शासकीय लेखा परिक्षकाकडून लेखा परिक्षण करण्यात यावे यासह विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली.

राज्यातील काही मोजके राज्यकर्तेच साखर उद्योगात वर्चस्व निर्माण करून साखर उद्योगात एकाधिकारशाही निर्माण करत आहेत. मुठभर कारखानदार साखर उद्योगाची सुत्रे स्वत:च्या हातात ठेवून चुकीचे कायदे करून उस उत्पादक शेतक-यांचे शोषण करत आहेत. वास्तविक पाहता साखरेसह उपपदार्थांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे राज्यातील शेतक-यांना एक रक्कमी एफ. आर. पी देणे सहज शक्य आहे. मात्र साखर कारखानदार प्रक्रिया खर्च वाढल्याचे कारण सांगत दोन किंवा तीन टप्यात एफ. आर. पी देण्याचा घाट घालत आहेत.

वास्तिवक पाहता उसाचे क्षेत्र मर्यादित असल्याने अंतराची अट टाकून नवीन साखर कारखान्यांना शासनाकडून मान्यता देणे बंद आहे. मात्र दुसरीकडे तीन हजार व पाच हजार गाळप असणारे कारखाने सध्या १८ ते २० हजार टनांनी गाळप क्षमता वाढवून गाळप सुरू केले आहेत. यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगामाचे दिवस कमी झाले असून याचा अनिष्ठ परिणाम कारखान्यांच्या अर्थकारणावर झाला आहे.
यामुळे येत्या आठ दिवसात साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व उस उत्पादक शेतक-यांचे थकीत ७ हजार कोटी रूपये १५ टक्के व्याजासह देण्यासंदर्भात साखर कारखान्यांवर आर. आर. सी अंतर्गत कार्यवाही न केल्यास साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक , ॲड. योगेश पांडे , पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर , यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

🤙 9921334545