लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेने काम केले तर महाराष्ट्र निश्चितच कर्करोग मुक्त होईल : प्रकाश आबिटकर

मुंबई : जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असून लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेने काम केले तर महाराष्ट्र निश्चितच कर्करोग मुक्त होईल असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

 

आरोग्य विभागामार्फत आजपासून राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान कर्करोगाविषयी व्यापक जनजागृती, तपासणी, निदान आणि उपचार केले जाणार आहेत.

कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पूर्वी शेतात श्रम करत असलेला माणूस शहरीकरणामुळे श्रम कमी करू लागला. त्याची श्रमाशी नाळ तुटली अन मानवाचे आरोग्य बिघडण्यास सुरवात झाली. अनेक आजार वाढत गेले. त्यात सर्वात भयंकर आजार म्हणजे कर्करोग आजार आहे. त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगावर आज मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. आरोग्य विभागातील ग्रामीण भागातील शेवटचा घटक व मंत्रालयातील सर्वात वरिष्ठ अधिकारी हातात हात घाऊन या आजाराला हद्दपार करण्यासाठी पुढे आला पाहिजे.

योग व इतर प्रबोधन कार्यक्रम राबवत संकल्प करत या आजाराला हद्दपार करावे लागणार आहे. व्यसनांमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असून लोकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आरोग्य विभागाने तसेच स्वयंसेवी संस्थांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. निर्व्यसनी माणसांना होणारा कर्करोग हा अधिक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाई, डॉक्टर्स, कर्मचारी, आआरोग्य सेविका, आशा सेविका यांनी आजपासून श्रद्धेने आणि गतिमान काम केले तर आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र ‘कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ होईल.”

या कार्यक्रमामध्ये रायगड कर्करोग आरोग्‍य सेवा माहिती पुस्तिका, तसेच मुख कर्करोग आणि मुख कर्करोग सदृश आजारांचे बाबत माहिती पुस्तिकेचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

त्याचप्रमाणे कर्करोग जनजागृती, तपासणी, निदान व उपचार सेवांमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या आरोग्य सेविका आणि आशा (ठाणे, रायगड), कर्करोग तज्ज्ञ, कर्करोग योद्धे, टाटा मेमोरिअल सेंटर या संस्थेचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आरोग विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव – २ श्री. विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक श्री. अमगोथू श्री रंगा नायक, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदिप गुप्ता, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे उपस्थित होते.