मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार का ?

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हात मिळवत मविआचं सरकार स्थापन केले. मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या वचनावरुन ही युती तुटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी वारंवार केला. मात्र आता याच मतभेदावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी विधान केले आहे.   

महाराष्ट्रात 2019 मध्ये  जे काही घडले त्यामध्ये भाजपाला सर्वात मोठा फटका बसला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला बहुमत मिळाले होते. शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरेंना आमच्यापासून दूर घेऊन गेले. उद्धव ठाकरे आमचे चांगले मित्र होते. ज्यांनी कोणी हा गोंधळ सुरु केला, त्यांनी हे संपवले पाहिजे असे उत्तर अमित शाहांनी दिले आहे.

ठाकरे गटाने मात्र युती तोडण्याचे खापर भाजपवरच फोडल आहे. उद्धव ठाकरेंना मित्र म्हणत अमित शाहांनी परत एकदा टाळीसाठी हात पुढे केला आहे का याचीच राजकीय चर्चा सुरु झाली आहे. याआधी भाजपसोबत येण्याची ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंना दिली होती. तेव्हा आता नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का हा प्रश्नही भाजपला विचारला जात आहे. यावरही अमित शाहांनी सूचक विधान केले आहे.

सध्या राज्यामध्ये भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाबरोबर युतीत आहे. आमची सध्या युती असून सारे काही सुरळीत सुरु आहे असे सूचक विधान अमित शाहांनी केले आहे. अमित शाहा हे भाजपचे राजकारणातले चाणक्य मानले जातात. तेव्हा लोकसभा निवडणुकीआधी अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या सूचक विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. निकालाआधी अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना घातलेली ही साद आहे का याचीही चर्चा सुरु आहे.

🤙 9921334545