रात्रीच्या जेवणानंतर शतपावली घालण्याचे अनोखे फायदे

चालणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज चालल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चालल्याने सर्व वयोगटातील लोकांना फायदा होतो. रात्रीच्या जेवणानंतर चालणं हे फायद्याचं ठरतं. याचा सुरुवातीला थोडा त्रास वाटू शकतो, मात्र एकदा का सवय झाली की तुमची शतपावली तर होईलच, शिवाय तुमचा व्यायामदेखील आपोआपच होईल. जेवल्यानंतर बहुसंख्य लोकांना लगेचच बसण्याची किंवा झोपण्याची सवय असते. जेवणानंतर लगेचच झोपी जाऊ नका, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाला अडथळा निर्माण होऊ शकतो.

रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे तुमच्या मेटाबॉलिझमला गती देण्यासाठी महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो. कारण चालण्यामुळे एकतर अतिरिक्त असलेल्या कॅलरी बर्न होण्यास मदत होते. वजन कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर रात्री जेवल्यानंतर चालण्याचा तुम्हाला फायदा मिळतो.

रात्री जेवल्यानंतर ३० मिनिटे चालल्याने पचनशक्ती सुधारते. अन्न सहज पचतं. याच्या मदतीने तुम्ही बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर समस्याही टाळू शकता. रात्री जेवल्यानंतर चालण्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते आणि याशिवाय शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये अधिक फायदा होतो. तुम्ही जेवणानंतर चाललात तर तुमची मधुमेहाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रात्री जेवणानंतर सुस्ती येते हे खरं असलं तरीही चालण्यामुळे तुमच्या शरीराला व्यवस्थित व्यायाम मिळतो आणि थकवा येऊन तुमच्या झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. तुम्हाला जर रात्री झोपायला त्रास होत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थोडावेळ चालण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमच्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी होईल आणि चांगली झोप लागण्यास अधिक मदत होईल. जेवणानंतर चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येऊन हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. त्यामुळे सहसा जेवल्यावर लगेच न झोपता किमान १५ मिनिटे चालून मगच झोपावे.

जेवल्याबरोबर लगेच झोपी गेल्यानं पचनाची प्रक्रिया आणखी मंदावते, त्यामुळे पोटाच्याही अनेक समस्या उद्भवू शकतात. सध्याच्या धावपळीच्या आणि बदलत्या काळात अनेक लोकांना तणावाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या समस्येसाठी रात्री जेवण केल्यानंतर चालणं हा चांगला पर्याय ठरू शकतो.