हार्दिक पांडेचा कर्णधारपद सांभाळण्याचा मंत्र सोपा

मुंबई इंडियन्स आज वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध यंदाचा शेवटचा सामना खेळणार आहे. आयपीएल २०२४ हे मुंबई इंडियन्सच्या चमूसाठी सर्वात अयशस्वी वर्ष ठरले होते. आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ यंदा मुंबई इंडियन्स ठरला आहे. आता फक्त चाहत्यांनी एवढीच अपेक्षा आहे की आजच्या सामन्यात जिंकून निदान मुंबई इंडियन्सने शेवट तरी गोड करायला हवा. 

यंदा मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वात झालेला मोठा बदल हाच अपयशाचे कारण असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे आतापर्यंत जे चाहते रोहित शर्माला कर्णधारपद मिळावे यासाठी हार्दिकला ट्रोल करत होते. तेच आता रोहितच्या खेळावर सुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत. हार्दिकवरील रोष अद्यापही कायम आहे. अशावेळी यंदा झालेल्या चुका व कर्णधार म्हणून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींविषयी हार्दिक पांड्याने आपले मत व्यक्त केले आहे.

हार्दिकने २०२२ मध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते.  २०२३ मध्ये सुद्धा हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघ उपविजेता ठरला होता. परंतु या हंगामात आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये हार्दिक मुंबईला मात्र केवळ चार विजय मिळवून देऊ शकला. हार्दिक म्हणतो की. “मला वाटतं की कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची माझी पद्धत सोपी आहे. हार्दिक पांड्या हा फक्त १० सहकाऱ्यांसह खेळतोय, त्यांची काळजी घेणं, त्यांना आत्मविश्वास देणं, तुम्ही करू शकता हे त्यांना पटवून देणं, त्यांना प्रेमाने वागवणं हा सोपा मंत्र मी फॉलो केला आहे. तरच कदाचित ते बाहेर १०० टक्के कामगिरी करू शकतील आणि मला तेच हवं आहे.”

पुढे तो म्हणतो की, “मी बहुधा निकालाचा विचार करणारा माणूस नसेल पण मी निश्चितच दृष्टिकोन चांगला असण्याला महत्त्व देतो. मी फक्त हे पाहतो की जो खेळाडू मैदानात उतरलाय त्याचा हेतू व दृष्टिकोन कसा आहे. जर त्यांचा हेतू हा संघाच्या हिताचा असेल तर मला वाटतं त्याचीच संघाला गरज असते व मदत होते.”