आरसीबीचे प्लेऑफसाठीचे समीकरण थोडे कठीण

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्समधील १६ मे रोजी होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर हैदराबाद संघ आयपीएल २०२४च्या प्लेऑफमध्ये धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. यासह दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या.  आता एका जागेसाठी आरसीबी आणि सीएसकेचा संघ  असे दोन दावेदार आहेत. आता या दोन्ही संघांपुढे प्लेऑफ गाठण्यासाठी समीकरण कसे असणार आहे? याची चिंता लागलेली आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज संघाची स्थिती पाहता आरसीबीचे प्लेऑफसाठीचे समीकरण थोडे कठीण आहे. प्लेऑफच्या शर्यतीत नेट रन रेटही महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्यामध्ये चेन्नईचा संघ पुढे आहे. जर आरसीबीने चेन्नईविरुद्ध प्रथम फलंदाजी केली तर त्यांना किमान १८ धावांनी सामना जिंकावा लागेल. जर प्रथम गोलंदाजी केली तर ११ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकावा लागेल. ही गणितीय समीकरण पार पाडली तरच आरसीबीला प्लेऑफचे तिकीट मिळेल आणि चेन्नई सुपर किंग्ज बाहेर पडेल. जर RCB १८ पेक्षा कमी धावांनी किंवा ११ चेंडू शिल्लक असताना जिंकू शकला नाही, तरीही चेन्नई आपोआपच उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल.

पावसाचा थेट फायदा चेन्नई सुपर किंग्जला होणार आहे. शनिवारी बंगळुरूमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर पाऊस पडला तर चेन्नई सुपर किंग्ज १५ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचेल. तर आरसीबी १३ गुणांसह सहाव्या किंवा सातव्या स्थानावर राहील.