
मुंबई: भाजपने १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यात सध्या जागावाटप अजून झाले नाही. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे तिढा वाढला आहे.
भाजपने जास्त जागा लढवण्याची तयारी केली आहे. मित्रपक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाही. त्याबद्दल शिंदेसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केलेला आहे. यामुळे यावर अजून तोडगा काढला नाही. मात्र सगळ्यांनी तयारी केली आहे.दरम्यान, रामदास कदम, गजानन किर्तीकर यांना भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी बोलून दाखवली. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा आवळा दिल्यानंतर आता लोकसभेच्या जागावाटपात कोहळा काढण्याची भाजपची रणनीती आहे.