
कागल : गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील मार्व्हलस मेटल्स ही कंपनी गेल्या 18 महिन्यापासून बेकायदेशीरपणे बंद आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे या कंपनीची चौकशी करून कामगारांना न्याय द्या. असे साकडे कामगार मंत्री सुरेश खाडे यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे घातले.
मार्व्हलस मेटल्स कंपनी मालकांमधील अंतर्गत वादामुळे कोणतीही पूर्वकल्पना अथवा लेखी नोटीस न देता अचानकपणे गेल्या 18 महिन्यापूर्वी बंद केली आहे. त्यामुळे कामगार रस्त्यावर आलेले आहेत. कर्मचाऱ्यांनी मालकांकडे कंपनी चालू करण्याबाबत व पगाराबाबत विचारणा केली असता मूळ मालक कंपनी विकल्याचा बनाव करून एका तोतया व्यक्तीस पुढे करून याबाबत चालढकल करत आहेत. याबाबत कामगार आयुक्त, उद्योग भवन, जिल्हाधिकारी यांना कर्मचाऱ्यांनी भेटून निवेदनाद्वारे कैफियत मांडली. पण या कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नाही.या कंपनीची चौकशी व्हावी व कामगारांना न्याय मिळावा.
याबाबत संबंधितांना आदेश व्हावेत. अशी विनंती या निवेदनात घाटगे यांनी केली आहे. त्यावर मंत्री खाडे यांनी संबंधित आयुक्तांना याबाबत तात्काळ चौकशी करून कार्यवाही करणे बाबत आदेश दिले आहेत. यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
