उमेद फाऊंडेशनची वंचितांच्या दारी दिवाळी उपक्रम

करवीर : कोपार्डे येथील उमेद फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतून कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत झोपड्या आणि पालात माळावर राहणाऱ्या ५०० वंचित कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करून 'वंचितांच्या दारी दिवाळी' साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.

सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) येथील माळावर कचरा वेचक, हेळवी, खुदाई कामगार, शेतात हंगामी काम करणारे मजूर अशी अनेक स्थलांतरित कुटुंबे राहण्यासाठी येतात. दिवाळी सणावेळी या कुटुंबांना उमेद फाऊंडेशनमार्फत प्रत्येक वर्षी फराळ वाटप करण्यात येते.

यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यकत्यांनी प्रत्येक झोपडी व पालात जाऊन रांगोळी काढली व आकाशदिवे लावण्यात आले. त्यांच्या झोपड्यांसमोर पणत्या पेटवण्यात आल्या. प्रत्येक कुटुंबाला दिवाळी फराळासह तेल, साबण, उटणे आणि कपडे वाटप करण्यात आले.

यासाठी सचिन बगाडे व अभय पाटील यांनी विशेष श्रम घेतले. यावेळी प्रकाश गाताडे, प्रा. एस. पी. चौगले, विनायक पाटील, दिगंबर पाटील, डॉ. खाडे, प्रदीप नाळे, प्रकाश म्हेत्तर, विक्रम म्हाळुंगेकर,एकनाथ पाटील यांचेसह उमेदीयन कार्यकर्ते उपस्थित होते.