परतीच्या पावसाचा कोल्हापुरात धुमाकूळ ; कोल्हापूरवासियांची तासभर तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला मंगळवारी अगदी पावसाने झोडपून काढले. परतीच्या पावसामुळे शहरात एकच धांदल उडाली. मात्र पावसाविना अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. तब्बल एक तास एकसारख्या संततधार सुरू राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले.

मंगळवारपर्यंत (दि. २) जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.यंदा मान्सून काहीसा नाराज आहे. जुलै महिन्याचा अपवाद वगळता पाऊसच झालेला नाही. पावसाळ्याचे चार महिने संपत आल्याने पाऊस होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

मंगळवारी सकाळपासून वातावरणात काहीसा बदल होत गेला. ढगाळ, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.सायंकाळी साडेचारनंतर कोल्हापूर शहरासह पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरच पाणी राहिल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. गटारीत पाणी न बसल्याने काही ठिकाणी रस्त्यावर आले होते.

दरम्यान, मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून आगामी पाच-सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.कोल्हापूर शहरात गणेश मंडळांचे देखावे खुले झाले आहेत. नेमका सायंकाळच्या वेळी जोरदार पावसाने सुरुवात केल्याने देखाव्याचे मंडप झाकण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसले.